Asia Cup 2022 : फुल्ल गरमा-गरमी..! बॅट्समननं चौकार मारल्यानंतर राशिद खान तापला; पाहा भांडणाचा VIDEO

WhatsApp Group

Rashid Khan And Danushka Gunathilaka Fight : आशिया चषक २०२२ स्पर्धेत (Asia Cup 2022) मोसमात अफगाणिस्तान संघाचा पहिला पराभव झाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं त्याचा ४ गडी राखून पराभव केला. स्पर्धेतील सुपर-४ टप्प्यातील हा पहिला  सामना होता. याच स्पर्धेच्या गटात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा (SL vs AFG) पराभव केला. श्रीलंकेनंही आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे. पण या सामन्यात असं काही घडले, ज्याची चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान या सामन्यात आपला संयम गमावताना दिसला. रागाच्या भरात तो श्रीलंकेच्या खेळाडूशी भिडला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

काय झालं?

ही घटना श्रीलंकेच्या डावाच्या १७व्या षटकात घडली, हे षटक राशिद टाकत होता.  तेव्हा श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी १८ चेंडूत ३१ धावांची आवश्यकता होती. दानुष्का गुनाथिलका स्ट्राइकवर होता. राशिदच्या पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीप शॉट खेळताना त्यानं चौकार मारला. राशिदला याचा धक्का बसला आणि तो दानुष्काला काहीतरी बोलला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा – IND Vs PAK : पत्रकारांसमोर ‘Sexy’ शब्द बोलण्यापासून द्रविडनं स्वत:ला रोखलं; काय घडलं? पाहा VIDEO

राशिदचं बोलणे ऐकून दानुष्काही त्याच्याजवळ गेला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोन खेळाडूंमधील हे भांडण फार काळ टिकले नाही, कारण भानुका राजपक्षे यांनी मध्यभागी येऊन प्रकरण शांत केलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राशिद खानच्या गोलंदाजीवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवला. त्याच्या ४ षटकात ३९ धावा झाल्या. त्यानं पहिल्या तीन षटकात २८ धावा दिल्या.

वानिंदू आणि भानुका यांनी श्रीलंकेला जिंकवलं

मात्र, या भांडणानंतर काही वेळातच दानुष्का पॅव्हेलियनमध्ये परतला. राशिद खाननं त्याला बाद केलं. पण वानिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षे हे श्रीलंकेच्या संघासाठी हिरो ठरले. दोघांनी संघाला विजयापर्यंत नेले. वानिंदूनं नाबाद १६ धावा केल्या. तर भानुका ३१ धावा करून बाद झाला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ६ बाद १७५ धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजनं ४५ चेंडूत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं १९.१ षटकांत ६ गडी गमावून १७९ धावा करून सामना जिंकला. संघाच्या एकाही फलंदाजानं अर्धशतक केलं नाही परंतु चार खेळाडूंनी ३० पेक्षा जास्त धावा केल्या. आता ६ सप्टेंबरला श्रीलंकेचा सामना भारताशी होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment