

People Carry Dead Body Through Flooded Water : महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसामुळं हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका यवतमाळ जिल्ह्यालाही बसला आहे. अशातच या जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळं लोकांना पुराच्या पाण्यातून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील माळ किन्ही गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळं लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नातेवाईकांना पुराच्या पाण्यातून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जावा लागला. जीव धोक्यात घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा – VIDEO : १५ बायकांसह आनंदानं गावात राहतोय ‘हा’ माणूस; मुलांची संख्या आहे १०७!
कुणाचा मृतदेह?
माळ किन्ही हे महागाव तालुक्यातील गाव आहे. या गावातील अविनाश काळणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी माळ किन्ही येथे आणला. मात्र दिवसभर पावसानं जोरदार हजेरी लावली. शिवाय स्मशानभूमीही नाल्याशेजारी आहे. अंत्यसंस्कारासाठी दुसरी जागा नसल्यानं नाल्याच्या पुरातून जाताना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर आली. नातेवाईकांनी खांद्यावर तिरडी घेत पुराच्या पाण्यातून वाट काढलीय.
यवतमाळ : पुराच्या पाण्यातून खांद्यावर तिरडी घेऊन मृतदेहावर स्मशनात अंत्यसंस्कार.#yavatmal pic.twitter.com/nLRRtdElaS
— Maharashtra Times (@mataonline) September 8, 2022
यापूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सोलापूर शहरातून समोर आला आहे. सोलापूरातील अक्कलकोटमध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्यानंतर एका व्यक्तीची अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून काढण्यात आली. पितापूर या गावातील ग्रामस्थांना नदीतून वाट काढत स्मशानभूमी गाठावी लागल्याच विदारक चित्र समोर आलं होतं.
हेही वाचा – VIDEO : रेशनच्या दुकानात मर्सिडीज गाडीवाला..! ४ गोणी टाकल्या डिक्कीत; इनक्रेडिबल इंडिया
महाराष्ट्रात मुसळधार
महाराष्ट्रात गुरुवारी पाऊस पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवणार आहे. हवामान केंद्रानं गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद इथं ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ इथं हलका आणि मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे.